Pages

  • शिवकाळ
  • रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी
  • माझ्याबद्दल

श्रीसमर्थ रामदासस्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली चाफळची सनद.

श्री समर्थ रामदास स्वामींना तर महाराज गुरूस्थानीच मानायचे. समर्थांना महाराजांनी लिहीलेले हे पुढील पत्र वाचल्यावर आपल्याला हे स्पष्ट समजूनच येते..



          “ श्रीसद्‍गुरूवर्य श्रीसकलतिर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज स्वामींचे सेवेसी चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेऊनु विज्ञापना जे, मजवर कृपा करुनु सनाथ केले, आज्ञा केली की, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव-ब्राह्मणांची सेवा, प्रजेचीं पीडा दूर करुन पाळणरक्षण करावे, हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनीं धराल ते श्री रघुनाथ सिद्धीस पावविल. त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट क तुरुक लोकांचा नाश करावा, विपूल द्रव्य करूनु राज्यपरंपरा आक्षई चालेल ऐशी स्थळें दुर्घट करावीं, ऐसें जें जें मनीं धरीलें तें तें स्वामिंनी आशिर्वादप्रतापे मनोरथ पूर्ण केले. याऊपरी राज्य सर्व संपादीले, तें चरणीं अर्पण करुनू सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला. तेव्हां आज्ञा झाली की, तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले, तेच करावे, तीच सेवा होय, ऐसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावे, श्री रघुनाथाची स्थापना कोठेतरी होऊनु सांप्रदाय, सिष्य व भक्ति दिगंत विस्तिर्ण घडावी, यैसी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगिव्हरी वास करुनु चाफळी श्री रघुनाथाची स्थापना करुनु सांप्रदाय सिष्य दिगंत विस्तिर्णता घडली. त्यास चाफळी श्री रघुनाथाची पुजा मोहोछाव, ब्राह्म‌णभोजन, अतिथी ईमारत सर्व यथासांग घडावे. जेथें जेथें श्री रघुनाथाच्या मूर्तीस्थापना जाहली तेथे उछाव पुजा घडावी, यांस राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावीं ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा झाली की, विशेष उपाधीचे कारण काय तथापी तुमचे मनीं श्री रघुनाथाची सेवा घडावी हा निश्चय झाला. त्यास येथाअवकाश जेथे जे नेमावेसें वाटेल तें नेमावे व पुढे संप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तसे करीत जावें. याप्रकारे आज्ञा जाहली. यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्री रघुनाथाच्या स्थापना जाहल्या, त्यास ग्रामभूमिची पत्रे करुन पाठविली. श्री रघुनाथ संनिध चाफळी येकशे येकविस गावीं आकरा बिघे प्रमाणे भूमी व आकरा स्थळीं श्री हनुमंताची स्थापना जाहली. तेथे नैवेद्य पुजेस भूमी आकरा बिघे प्रमाणे नेमिले आहेती, ऐसा संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेण्याविषयी विनंती केली, तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहली. त्याजवरून सांप्रत गावं व भूमी नेमिले. तपशील....

(येथे ३३ गावे, ४१९ बिघे जमिन, एक कुरण व १२१ खंडी धान्य यांचा तपशील दिला आहे.)

येकूण दरोबस्त सर्वमान्या गाऊ तेहेत्तीस व जमिन बिघे गाऊगना चारशे येकोणीस व कुर्ण येक, व गला खंडी एकशेएकविस श्रीचे पुजाउछाहाबदल संकल्पातील सांप्रत नेमिले व उछाहाचे दिवसास व ईमारतीस नख्ती यैवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. यीणेकरोन आक्षई उछाहादी चालविण्याविषयी आज्ञा असावी. राज्याभिषेक ५, कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे, आश्विन शुद्ध १० दशमी, बहुत काय लिहीणे हे विज्ञापना !”

पुढील पत्रात यामूळ पत्राची नकल करून इनाम कमिशनकरीता इ.स. १८६१ मध्ये ही नकल इनाम कमिशनच्या अधिकृत पत्रव्यवहारात समाविष्ट केल्याचे लिहीले आहे. सदर पत्राच्या अनेक नकला असून त्यातील काही पुणे पुराभिलेखागार, एक नक्कल सज्जनगड  तसेच मूळ प्रत धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात आहे.

     चाफळ सनदेच्या नकलेची सुरुवात : मायना     




          वरील पत्रावरून अगदी स्पष्ट दिसून येते की शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींना किती मानत असत. अर्थात समर्थांनीही महाराजांपाशी कसल्याही प्रकारची ‘मागणी’ केली नाही व रयतेलाही सदैव रामचिंतनाचा थोर उपदेश करून योग्य मार्गच दाखवला.





- कौस्तुभ कस्तुरे
Newer Post Older Post Home